शिक्षणाचे व्यापारीकरण: अवैध टाय-अपच्या वाढत्या मागणीला अन् महाविद्यालयांच्या दयनीय अवस्थेला महाविद्यालयेच कारणीभूत!
महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत गेल्या काही वर्षांत एक नव्या प्रकारचा मॉडेल वेगाने वाढत आहे — टाय-अप पद्धत, म्हणजेच मान्यताप्राप्त महाविद्यालय आणि खासगी शिकवणी वर्ग (क्लासेस) यांच्यातील अनधिकृत करार. विद्यार्थी महाविद्यालयात प्रत्यक्ष न जाता, फक्त खासगी क्लासेसमध्ये शिकतात आणि त्यांची उपस्थिती महाविद्यालयात दाखवली जाते. ही पद्धत शिक्षण क्षेत्राचे व्यापारीकरण वाढवत असून, पारंपरिक महाविद्यालयांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करत आहे.
टाय-अप म्हणजे काय?
खासगी शिकवणी वर्ग (क्लासेस) आणि मान्यताप्राप्त महाविद्यालय यांच्यात जो अनधिकृत करार होतो, त्याला टाय-अप असे म्हणतात. विद्यार्थ्यांचे नाव महाविद्यालयाच्या नोंदणीत दाखल असते, पण प्रत्यक्ष शिकवणी फक्त क्लासेसकडून दिली जाते. महाविद्यालय विद्यार्थी वर्गात हजर नसतानाही उपस्थिती दाखवते आणि फक्त परीक्षा वेळीच ते महाविद्यालयात येतात.
टाय-अप पद्धतीत नेमकं काय घडतं?
महाविद्यालय व क्लासेस यांच्यात विद्यार्थ्यांच्या प्रवेश व उपस्थितीबाबत गुप्त/अनधिकृत करार होतो.
विद्यार्थी अधिकृतपणे महाविद्यालयात प्रवेश घेतात, पण प्रत्यक्ष शिक्षण क्लासेसकडून होते.
महाविद्यालय विद्यार्थी हजेरी नसतानाही उपस्थिती दाखवते.
CET, NEET, JEE, CA-CPT तसेच बोर्ड अभ्यासक्रमाची तयारी एकाच ठिकाणी केली जाते.
शासकीय किंवा विद्यापीठाच्या परीक्षांना विद्यार्थी जणू ते महाविद्यालयात शिकले होते अशा नोंदीवर हजर होतात.
विद्यार्थ्यांकडून वार्षिक फी १.५ ते २ लाख रुपयांपर्यंत घेतली जाते, ज्यात महाविद्यालय व क्लासेस यांच्यातील आर्थिक वाटप ठरलेले असते.
शासकीय परीक्षांसाठी पात्रता आणि प्रश्नचिन्ह
शासकीय परीक्षांसाठी (JEE, NEET, ११वी, १२वी बोर्ड इ.) मान्यताप्राप्त महाविद्यालयात प्रत्यक्ष हजेरी व प्रवेश असणे बंधनकारक आहे. टाय-अप पद्धतीत हे नियम पाळले जात नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पात्रतेवर कायदेशीर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.
महाविद्यालयांची दयनीय अवस्था
सध्या अनेक पारंपरिक महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीने त्रस्त आहेत —
- तासिकेस विद्यार्थी हजर नसणे
- वर्ग ओस पडलेले असणे
- प्रवेश संख्येत मोठी घट
- २०२५ च्या केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत ५ फेऱ्या झाल्यानंतरही अनेक महाविद्यालयात जागा रिक्त
हे सर्व महाविद्यालयांच्या व्यवस्थापनातील दुर्लक्ष आणि स्पर्धात्मक तयारीतील अपयशामुळे घडत आहे.
पालक व विद्यार्थ्यांचा कल टाय-अपकडे का?
यंदा प्रवेश प्रक्रियेतील विलंबामुळे पारंपरिक महाविद्यालयांचा अभ्यास उशिरा सुरू झाला, तर टाय-अप क्लासेसने वेळेत सुरुवात केली.
स्मार्ट बोर्ड, डिजिटल क्लासरूम, ऑनलाइन टेस्ट सिरीज, वैयक्तिक मार्गदर्शन.
CET, NEET, JEE इ. परीक्षांची एकात्मिक तयारी.
क्लासेसमध्ये पालकांना हवे तसे नियम व अभ्यासावर लक्ष.
टाय-अपवरील निषेध
नाशिकमधील विविध विद्यार्थी संघटनांनी टाय-अप पद्धतीला विरोध दर्शविला आहे. जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह म्हणतो —
"शिक्षणामध्ये जर गुणवत्तेपेक्षा पैशाला प्राधान्य असेल तर अशा प्रकारांना आळा घालणे गरजेचे आहे. राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवर विश्वास कमी होत चालला आहे. शिक्षण बाजारपेठ बनले आहे, महसूलवाढीचे साधन झाले आहे."
विद्यार्थी प्रतिनिधीची प्रतिक्रिया
अदित्य रिकामे, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणतात —
"टाय-अप म्हणजेच शिक्षणाचे साटेलोटे. हा अवैध आणि बेकायदेशीर प्रकार आहे. खासगी क्लासेस मोठ्या प्रमाणात फी वसूल करत आहेत, जी सामान्य नागरिकांना परवडत नाही. राज्य सरकारने लवकरात लवकर यावर कायदा अमलात आणावा."
समस्या महाविद्यालयांतच
टाय-अप पद्धती वाढण्यामागील एक मोठा घटक म्हणजे पारंपरिक महाविद्यालयांची स्वतःची निष्क्रियता. वर्गखोल्यांमध्ये डिजिटल साधनांचा अभाव, शिक्षकांचा कठोर किंवा उदासीन स्वभाव, करिअर मार्गदर्शनाचा अभाव, आणि मूलभूत सुविधा न मिळणे — यामुळे विद्यार्थी खासगी संस्थांकडे वळतात. कोविड-१९ नंतर आरोग्य आणि स्वच्छतेबाबतची जागरूकता वाढल्याने पालक अधिक सजग झाले आहेत. नाशिक शहरातील बहुतांश महाविद्यालयांमध्ये शिस्त नावाचा प्रकार उरलेला नाही. महाविद्यालयांमध्ये प्रेमी युगुलांचा उदय होतो , विद्यार्थी गुन्हेगारांसारखे वागतात, वाईट संगतीने अंमली पदार्थांचे विद्यार्थ्यांना व्यसन लागणे , महाविद्यालयात उपहारगृह असल्याने तासिकांवेळी उपहारगृहांमध्ये वेळ वाया घालवणे आदी प्रकार अनेक महाविद्यालयांमध्ये सर्रासपणे सुरू आहेत.
निष्कर्ष
टाय-अप पद्धत ही महाविद्यालयांच्या दुर्लक्ष, गुणवत्तेचा अभाव आणि शिक्षण क्षेत्रातील व्यापारीकरण यांचे थेट उत्पादन आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी व शिक्षणातील पारदर्शकता टिकवण्यासाठी, शिक्षण विभागाने कठोर अंमलबजावणी करणे आणि महाविद्यालयांनी आधुनिक सुविधा व गुणवत्तापूर्ण अध्यापन देणे अपरिहार्य आहे. शिक्षण हे केवळ व्यवसाय नसून समाजघडणीचे साधन आहे, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा